नवापूर, रेल्वे रुळावरच बंद पडला ट्रक !
नवापूर सत्यप्रकाश न्यूज
शहरातील शास्त्रीनगर भागात असलेल्या रेल्वे फाटकावर एक मोठा अनर्थ टळला असे म्हणतात की 'काळ आला होता; पण वेळ आली नव्हती' ही म्हण आपण आजवर अनेकदा ऐकली असेल; मात्र बऱ्याचदा या म्हणीचा प्रत्यय देणाऱ्या अनेक घटना आपल्याला प्रत्यक्षात पाहायलाही मिळतात. अशीच एक घटना रविवारी रात्री नवापूर शहरालगत तीनटेंभा रेल्वे गेटवर घडली.
रेल्वेचे फाटक बंद करत असताना एक ट्रक रेल्वे रुळावरून मार्गस्थ होत होता. मात्र तो ट्रक रुळावरच बंद पडला. नेमक्या त्याच ट्रॅकवरून पॅसेंजर रेल्वे सुरतकडून भुसावळकडे मार्गस्थ होणार होती. चालकाने ट्रक सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र ट्रक सुरु झाला नाही.
सर्वांनी मिळून ट्रक रुळावरून हलवण्याचा प्रयत्न केला. पुढच्या बाजूला चढाव असल्याने ट्रक इंचभर देखील जागेवरून हलत नव्हता. नवापूर शहरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी येऊन ट्रकच्या पुढच्या बाजूने धक्का मारून रुळावरून बाजूला केला. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटातच पॅसेंजर त्याच रुळावरून गेली. पाच मिनिटांचाही विलंब झाला असता तर अनर्थ घडण्याची शक्यता होती.
सुदैवाने नागरिकांच्या सतर्कतेने कुठलीही दुर्घटना झाली नाही. या घटनेबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
Tags:
रेल्वे