केवळ खान्देशच तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंग निवासिनी देवीच्या चैत्रोत्सवास प्रारंभ झाला. पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. खानदेश प्रांतातील नंदुरबार, नवापूर, धुळे, साक्री, शिरपूर, जळगाव, धरणगाव,
मालेगावसह मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यांतील पालख्या व भाविक गडावर दाखल होत आहेत. त्यांच्या गर्दीन परिसर फुलला असून, संपूर्ण सप्तशिखर हे आदिमायेच्या जयघोषाने दुमदुमत आहे.
शुक्रवारी (दि. १९) सकाळची पंचामृत महापूजा विश्वस्त अॅड. ललित निकम यांच्या हस्ते सहकुटुंब करण्यात आली. यावेळी संस्थानचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, इस्टेट कस्टडियन प्रकाश पगार यांच्यासह सर्व विभागप्रमुख व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
यात्रोत्सवादरम्यान दोन वेळचे मोफत अन्नदान (महाप्रसाद) सुविधा देण्यात येत आहे. भाविकांच्या सुविधेसाठी २४ तास मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. वाढत्या उन्हामुळे भाविकांसाठी मंदिर परिसरात १२ पाणपोईंची व्यवस्था करण्यात आली आहे. सप्तशृंगगडावर व परिसरात आग लागून कुठलीही जीवित अथवा वित्तहानी होऊ नये म्हणून २४ तास अग्निशमन बंबाची व्यवस्था करण्यात आली आहे.
यात्रोत्सवात सर्व भक्तांना आपल्या आराध्य दैवतेचे दर्शन होण्यासाठी नाशिक विभागाच्या सर्व आगारातून विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे जेणेकरून देवीच्या भक्तांना दर्शनाचा लाभ घेता येईल.
Tags:
धार्मिक