सोलापूर सत्यप्रकाश न्युज
आपल्या देशाला स्वतंत्र होऊन आज 78 वर्षे झाली. आणि लोकशाही स्थापन होऊन 76 वर्षे झाली. दरम्यानच्या काळात आपल्या स्वतंत्र गणतंत्र असलेल्या देशाला चांगले वाईट अनेक चढ-उतार पहावे लागले आहेत. एका स्वतंत्र गणतंत्र देशाने करावे तेवढे कार्यकर्तृत्वही पार पाडले आहे. 
एका महासत्ताक देशाच्या दिशेला मार्गक्रमण करण्याचा उत्तम प्रयत्नही झाले आहेत, होत आहेत. स्वातंत्र्यानंतर अगदी सुरुवातीच्या काळातील लोकशाहीच्या मार्गातील अडथळा ठरत असलेली संस्थाने प्रजासत्ताक देशाच्या अंमलाखाली आणण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेलांना अनेक प्रयत्न करावे लागले. सरदारांच्या मनातील श्रेष्ठ भारत निर्माण होण्यासाठी स्वातंत्र्यानंतरही देशवासीयांना मुक्ती लढाया लढावे लागले.
जम्मू काश्मीरचा मुद्दा आता तीन राज्यात विभागल्यानंतर शांत झाला असला तरी त्यासाठी देशाला मात्र खूप काही सोसावे लागले आहे. जम्मू काश्मीर वगळून संपूर्ण देशात दाही दिशांना फडकणाऱ्या तिरंग्याला किती काळ प्रतिक्षेत रहावे लागले याचे आपण सगळेच साक्षीदार आहोत. कला, क्रिडा, साहित्य, संरक्षण, कृषी, औद्योगिक सारख्या हर एक विभागात प्रगतीचे पाऊल उमटलेले आहेतच.
लोकशाही तत्वे भारतीयांच्या मनात पूर्ण उतरले आहेत की नाही यापेक्षा इथल्या एकतेचा गौरव संपूर्ण जगात होते हे काही कमी महत्त्वाचे नाही! कधी पाकीस्तान तर कधी चीनच्या कुरापती आपण सहन करतोच आहोत. आजतागायत अनेक भूमिपुत्र दहशतवादी कारवायांना बळी पडले, शहीद झाले परंतु, सर्जिकल स्ट्राईकचा स्ट्रोक मात्र शत्रूंच्या मेंदूला चांगलाच झोंबला आहे हे विसरून चालणार नाही. 
आपल्या देशाचा इंच भागही आपल्यासाठी किती मोलाचा आहे हे वारंवार दर्शवून झाले आहे. संरक्षण विभागातील झालेले आमूलाग्र बदल देश सुरक्षित असल्याचे सदैवच ग्वाही देतात हे अचूकपणे लक्षात येतेच येते.
वेगवेगळ्या क्षेत्रातील काही ताजी उदाहरणे पाहता प्रगतीच्या दिशेने जाणाऱ्या महान भारताची अचूक ओळख होते. परवाच भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे स्वप्न धुळीस मिळवून "हम कुछ कम नहीं" हे सिद्ध करून दाखवले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील नोबेल समजल्या जाणाऱ्या "ग्लोबल टिचर" अवार्ड जिंकणाऱ्या डिसले गुरूजींनी देशाची शैक्षणिक मान उंचावली आहे.
कोरोनाचा कहर संपूर्ण जगाने झेलले आहे. पण म्हटले जाते की अवाढव्य लोकसंख्या असणाऱ्या भारताने प्रगत राष्ट्रापेक्षाही कितीतरी अधिक पटीने यशस्वीरीत्या कोरोना वॉर लढून दाखवलेले आहे. यासारखी अनेक उदाहरणे प्रगतीचे द्योतक ठरत आहेत. बऱ्याच क्षेत्रातील वानवा ही विसरून चालणार नाही. खूप मोठी जनसंख्या असल्याने भूकबळी, आर्थिकदृष्ट्या दुर्बलता, बेरोजगारी, बलात्कार, खून-दरोडे, महामारी, शेतीविषयक अनेक समस्या अजूनही आ वासून आहेत.
मात्र यासाठी केवळ शासनच जबाबदार आहे असे म्हणून चालणार नाही. "मेरा भारत महान" म्हणणाऱ्या प्रत्येक देशवासीयाच्या धमण्यांमध्ये लोकशाहीची तत्वे रूजली पाहिजेत तेव्हा कुठे आपल्या प्रजासत्ताक देशाला आणखी चांगली प्रगती साधता येईल.
शब्दांकन - आनंद घोडके, सोलापूर
लेखक काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राज्याध्यक्ष आहेत
७३९७८१३२३६
Tags:
दिनविशेष