आज गुढी पाडवा चैत्र नवरात्रोत्सवाच्या पहिला दिवस आजच्या दिवसाचे महत्त्व

.   नवापूर सत्यप्रकाश न्युज 
    शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे.* या दिवशी दारी गुढी उभारण्याची परंपरा आहे. गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक असल्याचे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच चैत्र नवरात्रीला सुरुवात होते आणि राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.* गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते. महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचर नावाच्या राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता चैत्र महिन्यातील पहिला दिवस म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणून गुढीपाडवा साजरा करतात.* तसेच ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस असल्याचे मानले जाते. पुढे सत्य-युगाची सुरुवात झाली आणि म्हणुनच नुतन वर्षारंभ म्हणुन चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात.* एका कथेप्रमाणे भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला, त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र-शुद्ध प्रतिपदेचा असल्याचे सांगितले जाते. शंखासुर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला बलाढ्य राक्षस होता. या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला. तेव्हा देवी-देवता, ऋषी-मुनींनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकवण्याची विनंती केली. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण केले आणि ते शंखासुराचा शिरच्छेद करणार इतक्यात शंखासुर म्हणाला की, भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले. आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा अशी की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपणांस स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा. तेव्हा भगवान विष्णूंनी तथास्तु म्हटले आणि शंखासुराचा वध केला. त्या दिवसापासून विष्णूंनी हातात शंखास धारण केले.* तर शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला.* तर एका आणखी कथेप्रमाणे प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करण्यास सुरुवात केली तीच देवीच्या अर्थात स्त्रीच्या रूपात सुरू केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्यादिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्यादिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. यालाच चैत्र नवरात्र म्हणतात. लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीची अभिषेक झाला. पार्वती लग्न झाले की माहेरवाशिणी म्हणून त्या महिनाभर माहेरी राहतात. तेव्हा त्यांचे कौतुक म्हणून चैत्रगौरीचे हळदीकुंकू केले जाते. अक्षयतृतीया यादिवशी देवी सासरी जाते.* श्रीराम अयोध्येला परत आले म्हणून हा सण साजरा केला जातो असेही म्हणतात. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला. गुढी म्हणजे फक्त ब्रम्हध्वजच नव्हे तर विजयध्वज देखील आहे. जेव्हा "श्री राम" लंकेवर विजय मिळवुन अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारुन मोठ्या आनंदाने केले. चैत्र शुध्द प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवास संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते.* तसेच असे ही सांगितले जाते की, चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले, तो हा विजयोत्सवाचा दिवस. घरातून वालीचा, आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे.* *गुढी कशी उभारावी, कशी पूजा करावी आणि कधी उतरवावी याबद्दल शास्त्रोक्त महत्व, माहिती...** गुढीपाडव्याच्या येण्याने जसे मानवाच्या तनामनात आनंदाने नवचैतन्य फुलावे, तसं काहीसं वसंताच्या येण्याने सृष्टीत उत्साह, हर्ष, रंग यांची उधळण होते. समस्त सृष्टीला हसवणारा, रिझवणारा, तृप्त करणारा, नटवणारा, तापवणारा वसंत म्हणजेच ऋतुराज. भगवान श्रीकृष्णांनी गीतेत वसंताचे वर्णन करताना म्हटले आहे.* *ऋतुनाम कुसुमाकर:* कुसुमाकर म्हणजेच वसंतऋतू तो म्हणजे मीच। कालिदासाने आपल्या ऋतुसंहारमध्ये वसंत ऋतूचे सुंदर वर्णन केले आहे. सर्व प्रिये चारुतरं वसन्ते* वसंत ऋतूमध्ये सर्वकाही सुंदर आणि मधूर भासते. याच मोहक वांसताचे आरोग्यद‍ृष्ट्या फार महत्त्व आहे. प्रत्येक ऋतूनुसार मनुष्याने दिनचर्येचे पालन करायला हवे.* अर्थात हिंदू नव वर्षाचा पहिला दिवस. हा दिवस आपण गुढी उभारून साजरा करतो. ती कशी उभारावी, कशी पुजावी आणि कधी उतरवावी, तसेच गुढी पाडव्याला काय काय करावे, याबाबत शास्त्र काय सांगते, ते जाणून घेऊया...* चैत्र शुद्ध प्रतिपदा हा शालिवाहन शकाचा पहिला दिवस असल्याचे तुम्ही वाचलेच आहे. या दिवशी कुटुंबातल्या सर्व स्त्री पुरूषांनी पहाटे उठून स्नान करावे. तत्पूर्वी घर स्वच्छ करावे. मुख्य प्रवेशद्वाराबाहेर रांगोळी काढावी. दाराला आंब्याच्या पानांचे व झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे. वडिलधाऱ्या व्यक्तीने घरातल्या देवांची मनोभावे पूजा करावी. आदल्या दिवशी विकत आणलेली वेळूची काठी आणून, ती धुवून तिच्या टोकाला धुतलेले स्वच्छ वस्त्र आणि सुवासिक फुलांची माळ बांधून त्यावर चांदीचा गडू, लोटी किंवा फुलपात्र अडकवावे. नंतर सर्व कुटुंबीयांच्या उपस्थितीत गुढी उभारावी. धर्मशास्त्रात यालाच *ब्रह्मध्वज* अशी संज्ञा आहे.* नंतर या गुढीची मनोभावे पूजा करावी. पाठोपाठ कडुलिंबाची कोवळी पाने वाटून त्यात मिरी, हरभऱ्याची डाळ, ओवा, मीठ वगैरे घालून ते मिश्रण सर्व सदस्यांना थोडे थोडे द्यावे. कडुलिंब खाणाऱ्याचे शरीर तेजस्वी आणि निरोगी बनते. नंतर गावातील राममंदिरात जाऊन प्रभू रामचंद्रांचे सर्व कुटुंबीयांनी मनोभावे दर्शन घ्यावे. परंतु, सद्यपरिस्थितीत मंदिरात प्रवेश नसल्यास घरातील रामरायाच्या प्रतिमेला नमस्कार करावा आणि हार घालून पूजन करावे. गुढी पाडव्यापासून चैत्र नवरात्र सुरू होते. ही नवरात्र देवीची आणि रामाची नवरात्र म्हणून साजरी केली जाते. राम नवमीला ही नवरात्र संपते.* आदल्या दिवशी नवीन पंचांग बाजारातून विकत आणावे. त्याची गुढीपाडव्याला पूजा करून त्यातील वर्षफल सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीत वाचन करावे. दुपारी सर्वांनी एकत्र सुग्रास अन्नाचे भोजन करून दिवस आनंदात घालवावा म्हणजे आगामी वर्षभर सुखाची प्राप्ती होईल. सूर्यास्तापूर्वी गुढीवर हळद-कुंकू आणि अक्षता वाहाव्यात. नंतर गुढी उतरवावी.* आपण सर्व हिंदू बांधव चैत्र प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानतो. म्हणून या दिवशी नवीन कार्याचा शुभारंभ करण्याचा प्रघात आहे. या दिवशी सर्व आप्तजनांना नवीन वर्ष सुख, समृद्धी, आनंद व आरोग्याचे, भरभराटीचे जावो अशी सदिच्छा द्यावी आणि नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करावे.* *गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाची प्रार्थना...** 'हे ईश्वरा, आज तुझ्याकडून येणारे शुभाशीर्वाद आणि ब्रह्मांडातून येणाऱ्या सात्त्विक लहरी मला जास्तीतजास्त ग्रहण करता येऊ देत.* या लहरी ग्रहण करण्याची माझी कुवत नाही. मी तुला संपूर्ण शरण आलो आहे. तूच मला या सात्त्विक लहरी ग्रहण करायला शिकव, हीच तुझ्याचरणी प्रार्थना..!* मला तिघेजण तुमचा फोन नंबर विचारत होते. पण मी फोन नंबर दिला नाही, तुमचा घरचा पत्ता दिला आहे. ते आज गुढीपाडव्याला तुमच्या घरी येतील. ते म्हणजे....* *
  लक्ष्मी - सरस्वती - गोविंद*l लक्ष्मी' तुमच्या घरी वैभव घेऊन येणार आहे.'सरस्वती' तुमच्या घरी बुद्धी घेऊन येणार आहे.*'गोविंद' तुमच्या घरी देवत्व घेऊन येणार आहे.* राग-रुसवे विसरुन, वाढवा नात्यातला गोडवा... एकत्र येऊन साजरा करुया, सण गुढीपाडवा... जल्लोष नववर्षाचा... मराठी अस्मितेचा... हिंदू संस्कृतीचा... सण उत्साहाचा... मराठी मनाचा... मराठी नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

Post a Comment

Previous Post Next Post